Sunday, 17 May 2020

इटली चे इंग्लंड ला पत्र



                लेखिका : फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री
            द गार्डीयन, २७ मार्च, २०२० १३:३६ GMT

                 अनुवाद: शीतल पवार

‌      इटली चे इंग्लंड ला पत्र: आम्हाला     तुमच्या भविष्याबाबत जे काय माहित आहे ..."

          रोम येथील लेखिका फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री आपल्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळातील अनुभवांच्या आधारे इंग्लंडच्या व एकूणच सर्व लोकांनी लॉकडाऊन व उठल्यानंतर काय अपेक्षा करायला हव्यात याबद्दल सांगते

           प्रसिद्ध इटालियन कादंबरीकार फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री Covid-19 च्या उद्रेकामुळे आपल्या इटलीतील रोम या  शहरात मागील जवळ जवळ तीन आठवड्यांपासून बंदिस्त आहे. ती आपल्या यूरोपीय मित्रांना "तुमच्या भविष्यातून" या पत्रात येणाऱ्या काही आठवड्यांत लोक ज्या विविध भावावस्थांमधून जातील त्याबद्दल लिहिते.

            मी तुम्हाला इटली येथून लिहीत आहे. याचाच अर्थ मी तुम्हाला तुमच्या भविष्यातून लिहीत आहे. आम्ही आता जिथे आहोत तिथे तुम्ही काही दिवसांतच पोहोचाल. Covid-19 या रोगाच्या साथीचा आलेख आपण सर्वांना एकाच वेळी गिळंकृत करत आहे. काळाचा विचार करता आम्ही काही पायऱ्याच तुमच्या पुढे आहोत, जसे वूहान शहर काही आठवडे आमच्या पुुढे होते. आम्ही जसे वागत होतो, तसे तुम्ही वागताना आम्ही पाहत आहोत. "हा फक्त फ्लू आहे, तेव्हा अनावश्यक गोंधळ कश्याला?" असे म्हनणाऱ्या लोकांपासून ते नेमके परीस्थितीचे गांभीर्य समजले आहे अश्या लोकांपर्यंत, आम्ही अलीकडील काळापर्यंत जी विधाने करायचो तशीच विधाने तुम्हाला करताना पाहत आहोत.
           आम्ही तुम्हाला इथून, तुमच्या भविष्यातून पाहत आहोत कि तुमच्यापैकी काही जणांना ऑरवेल, हॉब्झ यांनी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या बंद घरातच राहायला सांगितले आहे. पण लवकरच तुम्ही त्यातही खूप गुंतून जाल.
            सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जेवन कराल. ते फक्त सर्वात शेवटच्या गोष्टींपैकी एक गोष्ट, जी तुम्ही अजूनही करू शकता, यासाठी म्हणून करणार नाही.
          तुमचा रिकामा वेळ अधिक फलदायी मार्गाने कसा घालवता येईल याविषयी शिकवण्या देणारे डझनभर सोशल नेटवर्किंग ग्रुप्स तुम्ही पाहाल. तुम्ही त्या सर्वांना जॉईन व्हाल आणि काही दिवसांनंतर त्या सर्वांकडे पूर्णतः दुर्लक्ष्य कराल.
          तुम्ही संहार आणि जगाचा विनाशा बद्दलच साहित्य पुस्तकांच्या कपटातून बाहेर काढाल. पण लगेचच त्यातील एकही पुस्तक खरोखर वाचाव, असं तुम्हाला वाटत नाही, हे तुमच्या लक्षात येईल.
           तूम्ही आणखी एकदा जेवण कराल. तुम्ही नीट झोपू शकणार नाही. लोकशाहीला काय होत आहे? अस तुम्हीच तुम्हाला विचाराल.
        तुमचं ऑनालाईन सामाजिक जीवन विनाअडथळा चालू असेल. मेसेंजर, व्हाट्सअप, स्काईप, झूम यांवरती ...
        तुम्ही याआधी कधी नाही इतके तुमच्या मोठ्या मुलांची काळजी कराल. भविष्यात आता पुन्हा त्यांना कधी पाहाल याची काहीच कल्पना नाही, या जाणिवेने तुम्हाला छातीवर जोरदार बुक्की मारल्यागत धक्का बसेल.
       जुनी भांडणे आणि दुष्मनी तुम्हाला अनावश्यक वाटतील. पुन्हा कधीच आयुष्यात बोलायचे नाही अशी यांच्याविरुद्ध शप्पथ घेतली त्या लोकांना तुम्ही बोलाल, आणि विचाराल "कसे चालले आहे तुमचे?" कित्येक स्त्रियांना घरामध्ये मार खावा लागेल.
         जे घरामध्ये थांबू शकत नाहीत कारण त्यांना घरे नाहीत, त्यांचे काय होत आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यावर ओस रस्ते पाहताना, विशेषतः तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला असुरक्षित वाटेल. तर अश्या पद्धतीने समाज कोसळतो का? असे तुम्ही स्वतःलाच विचाराल. हे खरोखरच खूप वेगाने घडत आहे का? तुम्ही हे असे विचार थांबवाल आणि जेव्हा घरी परताल तेव्हा पुन्हा जेवण कराल.
          तुम्ही तुमचे वजन वाढवाल. मग तुम्ही ऑनलाईन फिटनेस ट्रैनिंगचा शोध घ्याल.
       तूम्ही हसाल. तुम्ही खूप हसाल. याआधी कधी नाही अश्या फाशीच्या विनोदावरही तुम्ही हसायचा प्रयत्न कराल. एवढेच नव्हे तर काही लोक ज्यांनी प्रत्येक मृत बाब गंभीरपणे घेतली, ते आयुष्य, विश्व आणि या सर्वांचाच विचित्रपणा यांवर चिंतन करतील.
          तुम्ही सामाजिक दुरता या नियमाला कायमस्वरूपी बांधील राहत सुपरमार्केटच्या रांगेमध्ये मित्र, प्रियकर/प्रेयसी यांच्याशी थोडावेळसाठी का होईना व्यक्तिगत भेटण्यासाठीच्या वेळा निश्चित कराल.
       तूम्हाला गरजेच्या नसणाऱ्या सर्व गोष्टींची तुम्ही मोजदाद कराल.
       तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचे खरे स्वभाव तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे उघड होतील. काही गोष्टींची तुम्हाला खात्री पटेल तर काही गोष्टींचे आश्चर्य वाटेल.
        नेहमी बातम्यांमध्ये असणारे विद्वान अदृश्य होतील.त्यांची मते अचानक अप्रासंगीक वाटतील. त्यातील काहीजण युक्तिवादामध्ये आश्रय घेतील, पण त्या युक्तिवादांमध्ये काडीमात्र सहानुभूती नसेल त्यामुळे लोक या विद्वानांना ऐकायचे सोडून देतील. ज्या लोकांना तुम्ही कमी लेखले होते ते लोक उलट आश्वस्त, उदार, विश्वासार्ह, व्यावहारिक, आणि द्रष्टे वाटतील.
        हि सगळी अव्यवस्था म्हणजेच पृथ्वी ग्रहाच्या नूतनीकरनाची जणू संधी, असे काही लोकांचे म्हणणे असेल. हे लोक हा गोंधळ पाहण्यासाठी तुम्हाला बोलवतील व या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन विकसित करण्यास तुम्हाला मदद करतील. हे लोक तुम्हाला अत्यंत त्रासदायक वाटतील: छानच, निम्म्या झालेल्या CO2 उत्सर्जनामुळे ग्रह आता अधिक चांगला स्वास घेतोय, पण तुम्ही पुढच्या महिन्याचे बिल कसे भरणार?
         नवीन जगाचा जन्म पाहणे हि अधिक भव्य कि दुःखदायक बाब आहे यातला फरक तुम्हाला समजणार नाही.
        तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि लॉन्स मध्ये संगीत वाजवाल. जेव्हा तुम्ही आम्हाला बाल्कनीमध्ये ऑपेरा गाताना पाहिले, तेव्हा विचार केला, "ओह, ते इटालीअन्स". पण आम्हाला माहीत आहे तुम्हीसुद्धा एकमेकांना मनोबल देेणारी गाणी गालं. आणि जेव्हा तुम्ही खिडक्यांतून "I Will Survive" हे गीत मोठ्याने गाल, तेव्हा आम्ही तुम्हाला पाहून वूहानच्या लोकांप्रमाणेच होकारार्थी डोके हलवू. त्यांनी फेब्रुवारी मध्ये आपल्या खिडक्यांतून गाणी गायिली होती आणि आम्हाला गाताना पाहून माना डोलावल्या होत्या.
          लॉकडाऊन संपल्या संपल्या पहिली गोष्ट जी मी करेल ती म्हणजे घटस्फोटासाठी अर्ज, अशी शपथ तुमच्यापैकी अनेकजण झोपण्यापूर्वी घेतील.
       खूप मुले गर्भात राहतील.
       तूमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल. ती भयंकर गोंधळ आणि प्रश्न निर्माण करतील.
       वृद्ध माणसे दंगेखोर युवकांप्रमाणे तुमच्या आज्ञा पाळणार नाहीत. त्यांना बाहेर जाण्यापासून, लागन होण्यापासून व मृत्यूपासून वाचवण्यासाठी, त्यांचे बाहेर जाणे थांबवण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी भांडण करावे लागेल.
      सर्व मेडिकल वरकर्सच्या पर्यायाप्रमाणे तुम्हालाहि गुलाबांच्या पाकळ्यात झाकून घ्यावे असे वाटेल.
        संपूर्ण समाज हा सामूहिक प्रयत्न करण्यासाठी एकवटला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच बोटीत आहात, असं तुम्हाला सांगीतलं जाईल. हे खरही असेल. हा अनुभव चांगल्यासाठीच बदलेल, एका संपूर्ण मोठ्या समूहाचा भाग म्हणून तुम्ही स्वतःकडे एक व्यक्ती म्हणून काय पाहता.
         वर्ग, खरेतर यामुळेच संपूर्णता भेद होणार आहे. सुंदर गार्डन व घरगुती प्रोजेक्ट्सची गर्दी असणाऱ्या घरात बंद केले गेल्याची स्थिती कायम राहणार नाही. त्याचबरोबर घरातून काम करता येणं शक्य होणं किंवा तुमचं काम नाहीस होतय हे पाहणं हि स्थिती देखील कायम राहणार नाही. ज्या बोटीमध्ये बसून तुम्ही सर्वजण सगळीकडे फैलावलेल्या साथीच्या रोगाला हरवण्यासाठीचा प्रवास करत असाल ती प्रत्येकाला सारखी वाटणार नाही, ना ती सर्वांसाठी सारखी असणार आहे. कारण ती कधीच सर्वांसाठी सारखी नव्हती.
          अशी एक वेळ येईल जेव्हा तुमच्या लक्षात येईल हे खरोखरच कठीण आहे. तुम्ही घाबरून जाल. तुम्ही तुमची भीती तुमच्या प्रियजनांजवळ व्यक्त कराल किंवा तुमच्याबरोबर त्यांनाही ओझं द्यायला नको म्हणून स्वतःजवळच ठेवाल.
       तुम्ही पुन्हा एकदा जेवण कराल.
       आम्ही इटलीमध्ये आहोत. आणि हेच आम्हाला तुमच्या भविष्याबद्दल माहित आहे. पण हे फक्त लहान स्वरूपातील भविष्य सांगणं आहे. आम्ही खरेतर खूप कमी द्रष्टे आहोत.
        जर आपण आपली दृष्टी अधिक दूरच्या भविष्यावर वळवली, भविष्य, ज्याबद्दल तुम्ही आणि आम्ही सुद्धा अनभिज्ञ आहोत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला एवढेच सांगू शकतो: जेव्हा हे सर्व संपलेल असेल, तेव्हा जग पूर्णपणे बदललेलं असेल.

© Francesca Melandri 2020

पराग गावकर लिखित "सेक्स मार्केट" : एका पुस्तकाचे हुंदके



           "एका पुस्तकाचे हुंदके"

              पराग गावकर लिखित 'सेक्स मार्केट' (2014), या सत्यघटनेवर आधारित पुस्तकाला डॉ. रुपेश पाटकर यांची आगळीवेगळी प्रस्थावना लाभली आहे. तीत रशियन क्रांतिकारी अलेक्झांद्रा कोलंताय हिची 'सिस्टर्स' हि कथा स्वैरपणे अनुवादली आहे.
               हि कथा या पुस्तकाचा नायक अरुण पांडे याला 1994 मध्ये MSW करताना देशाच्या विविध भागांतील देहविक्रयाच मार्केट अभ्यासात असताना ओळख झालेल्या संघटित गुन्हेगारी विश्वाच प्रातिनिधिक प्रतीक आहे. ती अशी...


                बाळाच्या मृत्यूनंतर नोकरीवरून काढलेली ती नवऱ्यालाही सोडते तेव्हा बेघर व बेकार होण्याची वेळ येते. शेवटीचा आशेचा किरण म्हणून ती लेखिकेच्या दारात याचना करत उभी असते, तेव्हा दोघींच्याही डोळ्यासमोरून तिचा यशस्वी गतकाल सरकतो.
                 इतर बोल्शेविक क्रांतिकारकांप्रमाणेच सर्व प्रकारचे शोषण नाहीसे करून एक न्यायी जग तयार करण्याचं स्वप्न असणाऱ्या त्या दोन सहप्रवाश्यांना वर्षभरानंतर एक कन्यारत्न होत. त्याला बढती व पगार वाढल्यानंतर तीच काम करणं त्याच्या प्रतिष्ठेच्या आड येऊ लागतं शिवाय घरात अधिक लक्ष दिल्यामुळे घर व्यवथीत राहील असही त्याच म्हणणं. दुसरीकढे तिच्या नवऱ्याच्या उत्पन्नाशी तिच्या काम करण्याच्या अधिकाराचा संबंध वरिष्ठांनी कसा लावला हे तिला पटत नसत. तरीही तो एका बिझनेस ट्रीपवरून परतेपर्यन्त सर्व ठीक चालत राहतं.
             तो आता मित्र, बिझनेस पार्टीजमुळे पिऊन येऊ लागलाय व कामामुळे आपल्याकडे लक्ष देत येत नसेल अशी समजूत तिने करून घेतलेली. पन एके दिवशी तो धम्माल करण्यासाठी मैत्रिणीला सरळ घरातच घेऊन आला तेव्हा तिच्या मनाचे तुकडे तुकडे झाले. दुसऱ्या खोलीत ते दोघे खिदळत असताना इकडे ती आजारी  बाळाला रात्रभर मांडीवर घेऊन बसली होती.
              सगळे विसरून त्याला माफ करणाऱ्या तिला तो तुला राहायला चांगले घर-कपडे देतो, कशाला नोकरी? असे भांडत राहतो. शेवटी ती नोकरी आवडते पण अल्पावधीतच बाळही जाते तेव्हा मात्र तो अंत्यविधीलही हजर राहत नाही. अन एके दिवशी पुन्हा तो एका तरुणीला घेऊन घरी आलाय हे यावेळीहि पचवणे तिला शक्य नसते. पण थोड्याच वेळात ती स्त्री हिच्यापुढे येऊन रडू लागते. 'मला वाटले तो एकटा राहतो, नोकरी गेल्याने आईचे आजारपण व चूल पेटवण्यासाठी आपण स्वतःला विकले' असे ती सांगू लागली.
               तो तथाकथित कॉम्रेड असहाय मुलीला मदत करायची सोडून तीच शोषण करत होता याचा तिला भयंकर संताप आला. त्याचवेळी नवऱ्याच्या मिळकतीमुळे आपण वाचलोय याची जाणीव झाली. तिने शेवटच्या पगाराचे सर्व शिल्लक पैसे त्या मुलीला दिले एक बहीण म्हणून. त्या रात्री तिचे त्याच्यावरचे प्रेम कायमचे मेले, जणू नव्हतेच कधी, ना कसली वेदना, तिने त्याला कायमचे पुसून टाकले.
                आज त्या दोघी सारख्याच होत्या, बेकार आणि बेघर. त्या मुलीला पुन्हा पैश्याची गरज होती म्हणून हि शेवटची आशा म्हणून लेखिकेच्या दारात उभी होती.
       इथे कथा संपते. पण अलेक्झांद्रा कोलंताय ने उभा केलेला देहविक्रयाचा प्रश्न सर्वांना अंतर्मुख करणारा आहे.
                या पुस्तकाच्या पुढील भागात अरुण पांडे यांनी 1997 ते 2004 या काळात गोव्यातील बायना या भागात देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या वेदना अन या धंद्यावर जगणाऱ्या पोलीस, राजकारणी व इतर तमाम घटकांशी भिडतानाचा संघर्ष टिपला आहे. अन जून 2004 च्या मध्यरात्री अचानक सरकारी ऑर्डर काढत ती अख्खी वस्ती उद्धस्त करीत सर्वांना विस्थापित करतानाचा अनुभवहि सांगितला आहे. 2013 मध्ये गोवा खंडपीठाने यांचं पुनर्वसन करण्याबाबत दिलेल्या निर्णयाची प्रक्रिया अद्याप पुढे सरकलेला नाही. मात्र अरुण पांडे 'अर्ज' या संस्थेच्या माध्यमातुन या स्त्रियांच पुनर्वसन करत आहेत.
            शेवटी या शोषणाच्या बदलनाऱ्या स्वरूपाबद्दल ते काळजी व्यक्त करतात. ते सांगतात अलीकडे सोफिस्टीकेटेड होत असलेला देहविक्रय तथाकथित सभ्य वस्तीतल्या बंगल्यात, पंचतारांकित हॉटेल, मसाज पार्लर, इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये, एखादी व्हॅन, इंटरनेट-मोबाइलवर दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या एस्कॉर्ट गर्ल्सच्या जाहिरातीच्या माध्यमातून चालतो. तेव्हा देहविक्रय करणाऱ्या या स्त्रियांच्या वेदना मिटवण्याचं काम आणखी आव्हानात्मक बनत आहे.
               
                                          #शीतलपवार#

"किल्ले सदाशिवगड भेट"



        "किल्ले सदाशिवगड भेट"

        सायंकाळी पाच वाजता मी व मैत्रीण कुठेतरी जाऊया म्हणून बाहेर पडलो अन गाडीवर बसल्यावर ठिकाण निश्चित केले किल्ले सदाशिवगड!


        कराडपासून पूर्वेला पाच सहा किलोमीटर अंतरावर ओगलेवाडीला लागून असलेल्या हजारमाची या गावातुन गड चढायला सुरुवात केली. समुद्रसपाटीपासून तीनेक हजार फूट उंची असणाऱ्या गडाला हजारेक पायऱ्या असाव्यात. गडाला लागून पूर्वेला सुरु होणाऱ्या सुर्ली घाटाच्या डोंगररांगांवरती व भोवतीच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने शिवरायांनी हा डोंगर ताब्यात घेऊन बांधून काढला असला तरी आज शिवकालीन अवशेष खचितच राहिलेले असतील. मात्र अलीकडील काळात  लोकसहभागातून गड संवर्धन व पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
         गडाच्या पायथ्याशीच असणाऱ्या दत्त मंदिराजवळ वेगाने बुडणाऱ्या सूर्याला कॅमेऱ्यातून नुसत्या तळहातावर कित्येकदा तोलून धरले. सायंकाळच्या उत्साही वातावरणामध्ये चढताना गडाचा विस्तार, विविध भुआकार यांबद्दल आश्चर्य वाटून त्याकडे  व बाजूच्या दगडांवरती लिहिलेल्या गड संवर्धनात्मक सुचनांकडे एकमेकींचे लक्ष्य वेधत होतो. त्यातील 'येथे प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यास मनाई आहे, अन्यथा बेदम चोप दिला जाईल' या धमकीवजा सुचनेतील शेवटच्या भागाची गड उतरेपर्यंत मला काहीवेळा अनावश्यक धास्ती वाटली कारण आम्ही कित्येकदा पायऱ्या सोडून बाजूच्या पायवाटेने चढायचो. किंवा आपल्याला बघणारे, ऐकणारे कोणी नाही याची खात्री झाल्याने ओरडत पळायचो.
           कॅमेऱ्याच्या डोळ्यातून स्वतःसह गड व खालील भुप्रदेश टिपत सावकाश चढत निम्यात पोहोचलो असताना वाढणारा अंधार बघून अधिकच थकवा आला. पण दुसऱ्याच क्षणी 'चडेंगे, लडेंगे पण पीचे नाय हटेंगे' ची गर्जना देत उसने अवसान बांधले. अन काही वेळातच गडमाथ्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याला सलाम केला. धावतच जाऊन काही अंतरावर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंड, नंदी, गणपती व त्यापुढे असणाऱ्या मारुती मंदिराचे दर्शन घेतले. तिथेच असणारा बारमाही आड/विहीर व बांधीव तलाव पाहिला. तोवर कुट्ट अंधार पडला होता.
           वरती आभाळभर टिपूर चांदणे पडले होते तर लक्ष्य दिव्यांचे पिठुर चांदणे गडाच्या चहूबाजूंनी धरतीवर उजळले होते. पश्चिमेकडून वाहणाऱ्या शांत व थंड वाऱ्याचा स्पर्श अनुभवणे हवेहवेसे वाटत होते. चार पाच एकरच्या गडमाथ्यावर पूजाऱ्याशिवाय कोणीच नसल्याने शिवाशिवी खेळत, गाणी बेसुरपणे ओरडत गड उतरायला सुरुवात केली. पायथ्याजवळ ढोलकीचा आवाज येताच त्या तालावर हास्यास्पद नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अन पुढे येऊन पायथ्याजवळच्या दुकानात बिस्कीट खाऊन पाणी पिल्यावर ऊर्जा आलिसे वाटताच समोरच भरलेल्या गावातील आठवडी बाजारात घुसलो.

Friday, 20 April 2018

लग्नसोहळा

गौर रंगाची कुरळ कुंतला           
   दु;खित सुंदर मधुबाला             
अमावसेपासून स्मृतीने                 
      झुरली पौर्णिमा प्रीतीने                  
चांदणी देई निरोप तिजला      
'हात मागतो चंदू तुजला'        
निरोप श्रवता तव कानी                 
लाजलाजली पौर्णिमा राणी            
साक्ष पटेना श्रवणाला             
'चंदू मागतो हात मजला?       
एकामागून गे एक दिवस                 
समारंभाची घोडदौड बस!                
भुरभूर भव काळ लोटला          
लग्न ठेपले आड दिसाला         
पहाटवारा झुळझुळ वाही                     
मंजुळ कोकीळ ओवी गाई                   
कावळा ढोलक बॅंडवाला         
लावन्यवीर मोर स्वागताला  
      पोपट, हंस, मैना, बदक                     
बहारीले भव संगीत                          
रंगीत जरीचे तोरण विशाल       
नारळ, फुले, पतकी-माल          
   गगनमंडपी रंग उधळला                      
सप्तभूवन नाचू लागला                     
शुभस्थानी अफाट गगनी            
भरली दारू शिगोशिगोनी            
   मंगलसमयी स्वर्गही आला                            
 स्वर्गाहून मोहक तेज तयाला                         
  चांद्कुरवल्या मार थाटात                    
जमल्या मंडपी पटापट                        
लाल, तांबडे , निळे प्रणांगण                               
त्रिभुवनाला देई आमंत्रण                                    
नवरी सुंदर सुममाला                             
शृंगार तियेने भव केला                           
असीम रुपेरी निळी पैठणी                                     
 तिजवर टिकल्या चांदणी                                      
दोन्ही करांत चुडा तियेला                        
धरतीने हिरवा भरला                              
सोने, चांदी, माणिक, मोती                                      
तेने पैठणी भारीली होती                                         
भट आणावया गे वराला                              
तत्क्षणी न चंदू आला                                  
प्रथम पाहिला मंडप डोकुनी                                          
आगमन होई मग हळू वाकुनी                                       
बसे टेकून कर क्षितिजाला                                  
भरजरी पोशाख मग ल्याला                               
तेथून निरखे सारा थाट                                                    
स्मितीत होऊन गाली बोट                                               
मग झपझप वरती आला                                        
पोशाख वराचा केला                                               
काय पांघरली जरीची शाल                                                  
स्तिमित होऊन देखे नारीनर                                               
कुठे वाजती सनई चौघडा                                              
वरातसमयी दिव्य घोडा                                                
रंगबिरंगी सुमने-हार                                                                  
करांत धरुनी पुढ्यांत वर                                                            
मंद छनकती पौर्णिमा बाल                                                                      
काय पांघरली जरीची शाल                                                                      
 परस्परांना हार घातला                                                                    
विरहाचा भव काळ लोटला                                                               
कर पसरुनी दोन्ही बाला                                                                                      
देई आलिंगन वराला                                                                                            
तव पूर हर्षाचा आला                                                                                        
वर घेऊन गे राणीला                                                                                        
   
: शीतल पवार                                         


Monday, 9 April 2018

पुन्हा...



ज्या झाडांच्या सहवासात
नसत मुळीच प्रेम,
संवेदनशीलता अन सहभावना,
संवाद अन आपलेपणा
विश्वास अन भविष्य इ...

उन्मळून पडतात ही झाडे सहज,
विजांच्या कडकडाटांनी अन,
वादळ वाऱ्यांच्या माऱ्याने...

घट्टमुळे रोवली नसलेल्या
परिस्थितीची अपरिहार्यता पाहत
त्यांना पडू..झडू..द्यावे वाळत...

सरपण मोडून वाहतांना भेलकांडत
ओरखडले खोलवर तरीही
जाळावीत लाकडे ढलप्यांंसह चुलीत...

मग उंच उडणाऱ्या राख...धुरांतून
द्यावी नवसंजीवनी पुन्हा परत !!

                                 - शीतल पवार